निलेश कवडे : पाच गझला


१.
दे जिव्हाळ्याची नव्याने वीण शहराला...
सैल नात्यांनीच केले क्षीण शहराला...

झगमगीच्या आड रात्री झाकते दगदग...
त्यात पोखरतो व्यथांचा शीण शहराला...

गुंतला चिंतेत आहे जीव इतका की
ना हवी दुसरी कुणी मैत्रीण शहराला...

ती निवारा शोधते पण सापडत नाही
रोज घिरट्या घालते पक्षीण शहराला...

ओळखत नाहीच कोणाला इथे कोणी
यापुढे ठेवू जरा 'ग्रामीण' शहराला

सौख्य अमिरीशी व्यवस्थेचे जुळत गेले
आणि गरिबी वाटली वैरीण शहराला

नेमके आयुष्य म्हणजे काय असते हे
सांगते प्रत्येक डोंबारीण शहराला...

२.
खिन्न रात्रींचा अचानक उलगडा दिसतो...
पापण्यांवर आतला आराखडा दिसतो...

लेकरांना 'बाप' हल्ली का? दिसत नाही
नेहमी माझ्यामधे 'म्हातारडा' दिसतो...

वाटते झाली बरी; तब्येत आईची
दोन दिवसांनी पुन्हा दारीं सडा दिसतो...

फेर काळाचा चुकत नसतोच कोणाला
भिंत रंगवली तरीही पोपडा दिसतो...

वाढला इतका विरोधाभास आहे की;
पावसाळाही कितीदा कोरडा दिसतो...

फासुनी शेंदूर देहाला बघू का? मी
वासनेला देह केवळ नागडा दिसतो...

अंतरंगाचे तलावावर वलय दिसते
शांत झाल्यावर पुन्हा हाती खडा दिसतो

३.
नकोशा वेदनांना मी असे समजून घेतो...
जुळत नसले तरी आयुष्यभर जुळवून घेतो...

नव्या गरजेस बापाला कळू ही देत नाही
जुना सदऱ्यास माझ्या आणखी उसवून घेतो...

अगोदर मुखवटा बदलायचा सोयीप्रमाणे
अता माणूस अपुला चेहरा बदलून घेतो...

असाही भक्त येतो मंदिरी जातेस तू त्या...
तुझ्या नकळत तुझे दर्शन कुणी लांबून घेतो...

हवेचा झोत येतो अन् दिव्याची ज्योत विझते
किती अलगद; अचानक प्राण 'तो' उचलून घेतो...

मनाचे गुज उघड कोणी करत नसतेच सगळे
वहीचे पान एखादे तरी दुमडून घेतो...

सुखाचे एकही अक्षर झरत नाही तरीही
अधाशासारखा मी पेन का झटकून घेतो...

४.
जग जरी नश्वर... अनामत ठेवली आहे...
वेदना दुनियेत शाश्वत ठेवली आहे...

झोपडीला झोपडी समजू नका केवळ
आत स्वप्नांची इमारत ठेवली आहे...

थेंब पाण्याचा जरी नसला तरी 'इच्छा'
फक्त आशेवर तरंगत ठेवली आहे...

सांज झाली अन् चिरांगण उजळुनी गेले
एक पणती मी प्रकाशत ठेवली आहे...

बांधली जखमेस होती, त्याच दस्तीने,
आजवर हिरवी दुखापत ठेवली आहे...

पाळले आहे अहिंसा तत्व शस्त्रांनी
शांततेसाठीच दहशत ठेवली आहे...

काफिया गझलेमधे माझ्या निभवतांना
वेदनेची मी अलामत ठेवली आहे...

५.
योग्य नव्हता तरी योग्यता वाढली...
चार पैश्यांमुळे पात्रता वाढली...

मंदिराची जुन्या भव्यता वाढली
ईश्वराची जणू वैधता वाढली...


आसवांचा झरू ना दिला थेंब मी
पापण्यांवर तरी आर्द्रता वाढली...

आज अवकाश सुद्धा थिटे वाटते
एवढी अंतरी रिक्तता वाढली...

प्रश्न पडतो बघुन हे विसावे शतक
आजवर कोणती सभ्यता वाढली...

जीवनाशी यमक साधल्यावर कुठे
जीवनाची पुढे गेयता वाढली...

मंदिराभोवती स्वार्थ रेंगाळला
हात पसरून आत्मीयता वाढली...

.........................................
निलेश कवडे अकोला

1 comment: