Showing posts with label मनोज सोनोने. Show all posts
Showing posts with label मनोज सोनोने. Show all posts

मनोज सोनोने : तीन गझला


१.
होईल शक्य तितकी, ठेवा जपून नाती.
नशिबात शेवटीला आहे 'अखेर' माती.

भाषा असो निराळी, वा धर्मही निराळा
वणव्यात जीवनाच्या जळतात फक्त जाती.

पक्षी हवेत उडतो, ठेवून लक्ष खाली
तैसीच माणसा तू मिळवून ठेव ख्याती.

आयुष्य छान आहे, उपयोग छान व्हावा
जैसे जळून येथे देती उजेड वाती.

कमवून ठेव लाखो, वा ठेव तू करोडो
तू आणले न काही नेशील काय हाती.

२.

घाव केला खोल माझ्या काळजाला.
अन् म्हणाली बोल ना ! का शांत झाला.

सहन केला विरह बारा वर्ष मी ही
दुःख नव्हते मात्र माझ्या चेह-याला.

तू अशी चिडलीस अन् संताप केला
वाटले की पेटली विस्तवच झाला.

प्रेम जर पाहायचे आहे तुला तर
ये पुढे डोळ्यात माझ्या बघ स्वतःला.

काय सांगावे तुला समजावुनी मी
समज होता गैरसमजातून झाला.

प्यायचा तर तूच आधी पी म्हणालो
मग विषाचा दे म्हणालो तोच प्याला.

दुःख अपुले ऐकतो का सांग कोणी?
खात असते आपले मन आपल्याला.

३.
अंतर्मनातुनी ह्या मी फक्त हाक द्यावी.
डोळ्यापुढे मला तू तेव्हा उभी दिसावी.

झिडकारले तिने मज बस याच कारणाने
की वाट मज यशाची दुनियेत सापडावी.

डोळे भरून मजला पाहून घेत होती
ही भेट शेवटीची माझी तिची असावी.

माझ्यासमोर आले गेले कितीक मजनू
माझी बरोबरी पण केली कुणी नसावी.

दारात विठ्ठलाच्या गेलो न मी कधीही
बहुतेक एक मूर्ती माझ्यामधे असावी.

............................................
प्रा. मनोज सोनोने
शेगांव.