Showing posts with label निशांत पवार. Show all posts
Showing posts with label निशांत पवार. Show all posts

निशांत पवार : पाच गझला


१.
मनाला मनाचे कळाया हवे
उगाचच कशाला झुराया हवे

तुझी याद येता दिसावीस तू
न घडले कधी, पण घडाया हवे

अबोला तुझा जीवघेणा किती !
मरण एकदा हे टळाया हवे

गवसणी नभी शक्य आहे गड्या
तुझे एकदाचे ठराया हवे

विरोधात माझ्या उभे विश्व हे
जरी हारलो, मी लढाया हवे

कितीही गिरव जीवनाचे धडे
पुन्हा ते कसब तू शिकाया हवे

किती दीर्घ मुक्काम झाला इथे !
प्रवासास पुढच्या निघाया हवे

२.
वेदनेचा यार झालो तर ?
काळजाला भार झालो तर ?

नाटकी अवसान आहे मी
जीवघेणा वार झालो तर ?

सोहळा मज व्हायचे आहे
बेगडी सत्कार झालो तर ?

जन्म प्यारा मानवाचा हा
शेवटी अवतार झालो तर ?

एक वेडे स्वप्न आहे मी
मी अवेळी ठार झालो तर ?

वाटते मज विस्कटावेसे
मांडणी क्रमवार झालो तर ?

भरकटावे व्यर्थ मी कुठवर
वादळावर स्वार झालो तर ?

३.
रंगतो रंगात जेव्हा आठवांच्या
एकटा गर्दीत उरतो माणसांच्या

सांग मी राहू कसा नामानिराळा
जाहलो मोर्च्यात सामिल वेदनांच्या

व्यर्थ आहे जाणतो, पण का तरीही
शोधतो गर्दीत तुजला तारकांच्या

मन अताशा हिंडते शहरात माझे
झोपडीमध्ये रमेना काटक्यांच्या

रोज भरती येत जाते सांजवेळी
एक सागर आत दडला पापण्यांच्या

४.
काय सांगू तुला कसा आहे
मी जसा वागतो तसा आहे

आवडो नावडो जगाला मी
मी मला भावतो जसा आहे

जीव झाला खुळा कधीकाळी
अंतरी खोलवर ठसा आहे

सांगतो हे जरा विषादाने
कोरडा आजही घसा आहे

जिंकतो हारतो लढाया मी
एक माझ्यातही ससा आहे

५.
झाकोळले जगाने, झालो पुन्हा प्रखर मी
वहिवाट जीवनाची, केली अशी सुकर मी

आशा, कधी निराशा; असते सदैव सोबत
जागून काढलेला, आहे खुळा प्रहर मी

मी पाहिलीच नाही, आरास तारकांची
आले नभात तारे, नव्हतो कधी हजर मी

कळले मला न काही, गेला उजेड कोठे
अंधार प्राशनारे, का भासतो विवर मी ?

धास्तावलो कितीदा, आश्वस्त जाहल्यावर
सांगायचो जगाला, आहे जरा निडर मी !

जपला जिवापरी मी, अज्ञातवास माझा
मारेकऱ्या, तुला रे; केव्हा दिली खबर मी !

मी पायवाट होतो, ग्रामीण जीवनाची
माझे मला कळेना, झालो कधी शहर मी !
.............................................
निशांत पवार