प्रचितीचे बोलणे... आणि चिमणीचा खोपा... : सुरेश भट




प्रचितीचे बोलणे म्हणजे कविता

...आज मराठी गझल म्हणजे मराठी काव्यातील एक शक्तिशाली वस्तुस्थिती आहे, हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसांनी- विशेषतः,तरूण पिढीने मराठी गझलेचा संपूर्ण स्वीकार केलेला आहे. येथे' स्वीकार' हा शब्द फार महत्त्वाचा. सोयीनुसार, परवडते म्हणून किंवा 'करीयर'साठी गझल लिहायची नसते. गझलच कशाला, कोणताही काव्यप्रकार हाताळायचा नसतो! जे 'करीयर'साठी गझलेकडे वळले, त्यांची हालत ' न इधर के रहे, न उधरके रहे!' अशी झालेली आहे. केवळ गझलेच्या फॉर्ममध्ये लेखन केले, म्हणूनही ती गझल ठरत नसते.'फॉर्म' सांभाळून केलेल्या निर्जीव लेखनाला 'गझल' म्हणत नसतात.अशी तथाकथित गझल कोणताही परिणाम करीत नसते, आणि ज्याची थांबण्याची तयारी नाही, त्याने गझलेच्या वाटेला जाऊ नये!
खरे तर ज्याच्यात मुळातच दम नसतो, अशा कवीचा कोणताही काव्यप्रकार अपयशीच ठरतो. मग लिहिणारा कुणीही असो. मी कवितेच्या यशाची एक व्याख्या केलेली आहे: जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर रसिकाच्या कायम स्मरणात राहते, जिचा नेहमीचा जनजीवनात प्रत्यय येतो, ती यशस्वी कविता!
कुणीही फक्त स्वतःसाठीच कविता करीत नसतो. कारण कविता हा संवाद आहे. अगदी व्यक्तिगत स्वरूपाची कविता वाटत असली, तरी वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला तिच्यात स्वतःच्या जीवनाचे प्रत्यय येत असतात.' अरे हा तर माझाच मनातले बोलतोय्! अरे, असेच घडले की, माझ्या बाबतीत!' असे रसिक म्हणत असतो.
प्रचितीचे बोलणे म्हणजे कविता.
पण जी मराठी माणसाला जाणवत नाही, ती कविता काय? जी नित्यनेमाने पाडली जाते, ती कविता काय? केवळ शब्दांची हगवण म्हणजे कविता काय? किंवा महापुरुषांच्या पवित्र नावांच्या संगिनी छातीवर रोखून आपली कविता महान आहे, असे जुलूम-जबरदस्तीने सर्टिफिकेट मिळवले, म्हणून संबंधित कवी महान ठरतो काय? जो शिलक राहतो, तोच मोठा! तेथे जात आणि धर्म उपयोगी पडत नाही. तेथे ग्रामीण किंवा शहरी, असा अभिनिवेश कामी पडत नाही. तेथे कळप कामाचे नसतात. सत्य, साधेपणा आणि माणुसकी हीच कवितेची खरी शक्ती असते- मग ते सत्य वैयक्तिक असो किंवा सामाजिक असो. ज्याला सोपे लिहिता येत नाही, तो कवी नसतो. कारण ज्याच्यात धमक नसते, तोच दुबळा व भित्रा इसम साधा उंदीर मारण्यासाठी ऍटम बॉंबचा उपयोग करतो. एक साधी गोष्ट सांगण्यासाठी अगडबंब शब्द कशाला हवेत? तर ते असो.
 मला कवितेच्या बाबतीत जे वाटते, ते मी येथे लिहिलेले आहे. माझी भूमिका रसिक वाचकांनी समजून घ्यावी, म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे. बाकी कोणताही अभिनिवेश नाही. माझ्या मर्यादा मला ठाऊक आहेत.
                                     हम कहाँ के दाना थे? किस हुनर में यक़ता थे?
मुफ़्त ही हुआ, 'ग़ालिब' दुश्मन आसमाँ अपना!

- मी कुठे बुद्धिवान होतो? मी कोणत्या कलेत एकमेव होतो? अरे 'गालिब', दैवाने माझ्याशी उगीचच वैर धरले!
■ सुरेश भट
■■
'आपुलिया बळें नाही मी बोलत... '
ह्या'झंझावात ' च्या
मनोगत मधून?
...........................

चिमणीच्या खोप्यात आकाशाची चर्चा


कवी आणि त्याच्या काव्याचा फैसला सामान्य जनताच करीत असते. स्वतः कवी किंवा समीक्षक नव्हेत. ज्या भाषेत काव्य लिहिले जाते, त्या भाषेत काव्यलेखन करणाऱ्या कवीचे सर्वोच्च न्यायालय, म्हणजे ती भाषा बोलणारी सामान्य जनताच असते. हे साधे सत्य मला ठाऊक आहे. हे सत्य मी आयुष्यभर स्वतः अनुभवलेले आहे, आणि मराठी समीक्षेच्या एकूण प्रामाणिकपणावर माझा विश्वास नाही. सर्वसाधारणपणे मराठी समीक्षा आधी ठरवून केली जाते.
ज्याच्या त्याच्या जगण्याच्या मूल्यांनुसार ज्याच्या त्याच्या काव्यलेखनाचा व समीक्षेचा सौंदर्यबोध( Aesthetic Sense) असतो. चिमणीच्या खोप्यात आकाशाची चर्चा करणाऱ्यांचा कसला सौंदर्यबोध?
...मी सौंदर्यशास्त्राचा अभ्यास केलेला नाही. जर मी तेवढा विद्वान असतो, तर कवी कशाला बनलो असतो? पण माझा एक सोपा सिद्धांत आहे:
जो फक्त स्वतःवर प्रेम करतो, जो माणसांवर प्रेम करू शकत नाही, ज्याला चीड व संताप येत नाही, तो इसम संवेदनाशून्य असतो, आणि ज्याच्या 'संवेदना' फक्त स्वतःपुरत्याच मर्यादित असतात, तो कोडगा इसम कवीच कशाला, माणूससुद्धा नसतो. म्हणूनच मी कबीर आणि तुकारामाला मानतो!

■ सुरेश भट
■■
'आपुलिया बळें नाही मी बोलत... '
ह्या'झंझावात ' च्या
मनोगत मधून

No comments:

Post a Comment