शरद बाबाराव काळे : तीन गझला


१.
वाळूवरती रेघोट्या मी ओढत गेलो
लाटांना त्या मोडण्यास मग सांगत गेलो

तिच्या लोचणी थेंब जरासा डबडबल्यावर,
काळजास मग हळूच माझ्या कोरत गेलो

पावसास मी किती विनवले येण्यासाठी,
पुन्हा पुन्हा मी घर कौलाचे फेरत गेलो

कशा दाखवू तिला मनाच्या चंचल लाटा
दुःख मनाचे एकट्यात मी गाळत गेलो

तिने न जावे सोडुन माझा हात कधीही
इतक्यासाठी शब्द तिचा मी पाळत गेलो

२.
तुझ्या माझ्यातले अंतर जरासे दूर होऊ दे,
मनाच्या शांत लाटांना अता तू पूर होऊ दे.

तुझे किंतू परंतू चे बहाणे हे पुरे झाले,
तुझ्या नाजूक ओठांचा सखे मज सूर होऊ दे.

दिव्याला लाभले येथे जसे हे भाग्य जळण्याचे
तुझ्यासाठी जळावे मी असा कापूर होऊ दे.

मला नाही जरा चिंता जमाण्याची सखे आता,

तुझ्या नावे मला थोडे अता मशहूर होऊ दे.

सुगंधी जाहल्या जखमा तुझा तो स्पर्श झाल्यावर
अता हा देह सरणावर भलेही धूर होऊ दे.

३.
शब्द फुलांचे वैभव सारे तुझ्याचसाठी,
मन डोहाचे खोल किनारे तुझ्याचसाठी.

चिंब भिजावे मन माझे हे तुला स्पर्शता
मन मोराचे सर्व पिसारे तुझ्याचसाठी.

भिरभिरणारी नजर शोधते तुला कैकदा,
या डोळ्यांचे सर्व इशारे तुझ्याचसाठी.

माझ्या कविता,माझ्या गझला देतो तुजला
या हृदयाची खुलीच दारे तुझ्याचसाठी.

येता जाता छळते आहे तुझी आठवण,
भाव फुलांचे सर्व नजारे तुझ्याचसाठी

.............................................
शरद बाबाराव काळे
धामणगांव रेल्वे
९८९०४०२१३५

No comments:

Post a Comment