गझलनंदा : चार गझला


१.
मला अंधार आवडला दिशा सांजावली आता
कुणासाठी इथे लावू दिव्यांची आवली आता

कशी केली कुणी केली व्यथांची मांडणी माझ्या
भरावे रंग नियतीने सजे रंगावली आता

उन्हाने बांधता घरटे शिरावर आज माध्यान्ही
तशी सोडून गेलेली दिसे का सावली आता

उडाले पंख घेवोनी पिलू ना येत माघारी
तरूने काय बहरावे मुळे खंतावली आता

सशाची झोप उडताना हळू कानात सांगावे
मघाच्या कासवाची चालही मंदावली आता

कशाला जीवनाचे गीत मी गाऊ तुझ्यासाठी
सरे आरोह जगण्याचा पुरी भांबावली आता

जरासा पूल बांधावा विचारांचा घरामध्ये
तुझ्यामाझ्यात असलेली दरी रुंदावली आता

२.
मेंढरे ही का अशी पळतात आताशा
वाघरांना सोडले कळपात आताशा

या इथे अन् पेटवा तुमच्या मशालींना
का मुक्या पणत्या इथे जळतात आताशा

राजमार्गानेच जावे नेमके वाटे
वेगळ्या गल्ल्या किती वळतात आताशा

कौतुकाचे झेलले मी शब्द थोडेसे
बोचऱ्या निंदाच त्या कळतात आताशा

अक्षरे पुसली तरी नाराज नाही मी
मज सुरांच्या या लडी स्मरतात आताशा

मी पुन्हा गझलेस पुसते बोल ना काही
का इशारे लांबुनी छळतात आताशा

नेमकी आहे लढाई सांजवेळेची
पण किती जखमा जुन्या सलतात आताशा

मला सांगायचे होते तुला जे काल ओठांनी
कसा ओठांवरी लिहिला तराणा काल ओठांनी

इथे वा-यासवे आली जरा चाहूल थंडीची
मुक्याने ओढुनी घ्यावी धुक्याची शाल ओठांनी

मधु ओठात असताना स्वरांची पहिली स्वप्ने
तुझ्याशी बोलता कळले दिली हो चाल ओठांनी

हळू पाऊल वाजावे निशेचे माझियादारी
सुखे गुलकंद चाखाया धरावे गाल ओठांनी

पुरे संगीत ताऱ्यांचे नको तबला नको पेटी
प्रितीचे गीत गाताना धरावा ताल ओठांनी

४.
स्वप्न पडावे डोळे मिटता थकल्यानंतर
कुशीत यावा साजण माझा निजल्यानंतर

स्वच्छ जाहले निळे किनारे आकाशाचे

श्रावणधारा नभातुनी या झरल्यानंतर

आयुष्याला कुठे कुठे मी ठिगळे लावू
भाळावरची रेघ उसवली शिवल्यानंतर

पुन्हा न यावा पाकोळ्यांचा थवा रेशमी
दिवा उशाशी तटस्थ होता विझल्यानंतर

नवी कल्पना शायरीतली सुचेल नक्की
आठवणींचे धुके जरासे विरल्यानंतर

तुला हवे ते घडेल सारे थांब जरासा
गाठ धरेची आभाळाशी पडल्यानंतर

झरती डोळे तसे झरूदे निचरा होतो
सुखे साठवू भेट आपली घडल्यानंतर

.........................................................
गझलनंदा

No comments:

Post a Comment