कविता डवरे : दोन गझला



१.
सभ्य त्यांचे  चेहरे निरखून घेतो.
मी स्वतःची वंचना खपवून घेतो.

तो किनाराही कधी गपगार होता.
वादळाचे वागणे समजून घेतो. 

लागता मोहोळ आशेचे उठाया
कालचा अंधार अंगारून घेतो.

उंच शिखरे पर्वताची गाठताना  
पाय मातीचेच मी जडवून घेतो.

मी उद्याचा हात हाती घेत असता
जीवनाशी आजच्या  जमवून घेतो.

२.
झाली वसान सारी नगरी पुरात आता
उडतील पाखरे ही कोण्या नभात आता ?

मी जीवना कशाला ठेवू तुझी उधारी
तूही लुटून घे ना जे जे घरात आता !

सारेच सोबतीला होते सुखात तेव्हा
जातात दूर सारे सोडून हात आता !

सुनसान गाव झाले माझे कसे मनाचे ?
थिजुनी जगावयाची सारी हयात आता !

राखून हातचे मज जगता कधी न आले
ठरलेच बेहिशेबी फसव्या जगात आता !
  
.............................................................
कविता डवरे 'निती'
अमरावती

3 comments:

  1. मी उद्याचा हात हाती घेत असता
    जीवनाशी आजच्या जमवून घेतो. ...वाह!

    ReplyDelete
  2. Very brilliant and emotional way of expressing our self . 'Though we fly in infinate sky with no limits to our ambitions and materialistic possessions ,we still need to be attached with our soil '

    ReplyDelete
  3. झाली वसान सारी ....आवडली

    ReplyDelete