शिवाजी जवरे : पाच गझला


१.
प्यास ही एकच या सुंदर सायंकाळी
ये तुझ्या हातून प्याला भर सायंकाळी

सोड आठी मन मोठे कर सायंकाळी
पाहते वाट तुझी हे घर सायंकाळी

जीवनाचे कळले वावर सायंकाळी
बैलही मीच न् मी नांगर सायंकाळी 

मी तुला काय लिहू व्याकुळता शब्दांनी
पूस दोघातील हे अंतर सायंकाळी

पूर्ण गावात कराया जलपूर्ती त्यांनी
बांधला बांध नकाशावर सायंकाळी

संपले शत्रू तरी युद्ध कधी संपे ना
आतल्या आत पुन्हा संगर सायंकाळी

मीच नेईन तुझे पैलतीरावर तारू
सोड  पाण्यावर तू घागर सायंकाळी

एक आवाज भुईतून इशारा देतो-
वाहता ठेव तुझा पाझर सायंकाळी

सावलीला घर देईल तुला कोणी पण
कोण देतो घरची पाखर सायंकाळी

वेच मातीतून माती अन तू हो माती
याच मातीत पुन्हा मोहर सायंकाळी

२.
घरातून लिहितोस अहवाल तू
पिकाचा कधी पहिला हाल तू

मला जो हवा मार्ग चालेन मी
तुला वाटली वाट ती चाल तू

कितीदा तुला मी दिल्या ओळखी
हमेशा झटकली जणू पाल तू

अशा कागदाला उभे जाळ तू
जिवालाच दे ताप जो फालतू

विषमता आपली अशी संपली
फुफाट्यामधे मी न् कंगाल तू

तगडा किती लावते मौत ही
मढ्यावर तिच्या प्राण हा घाल तू  

तुझा ताल मी पाहतापाहता
मला मस्त केलेस बेताल तू

प्रसिद्धी-फुलोऱ्यास पाणी हवे
तुला घालतो मी मला घाल तू

३.
काळ्या वर नभी अन मुला खोल राहो
तुझ्या भोवती सारखी ओळ राहो

उभा देह आम्ही करू कान तेंव्हा
गळ्याशी तुझ्या भूप-हिंडोल राहो

तिला मी नकोसा तरी भेट होते
धरा गोल आहे धरा गोल राहो

जरी विश्व आम्हा कुटुंब परी हे
मुखी मायबोली तला बोल राहो

तुझा ध्यास दिवसा तुझे स्वप्न रात्री
तुझ्याही उरी हाच माहोल राहो

असे रान समृद्ध वाढो इथे की 
सुखे मोर-लांडोर- चांडोल राहो

नको व्यर्थ चिंता ग्रहाच्या गतीची
माती आपुली एक समतोल राहो

चलाखीतली जीत ही जीत नाही
साचोतीत्ला घाव अनमोल राहो.

४.
हाक तू ही न दिली मी पण वळलो कोठे
एकमेकास पुन्हा शोधून दिसलो कोठे

लोक गातील मला गीत गझल कवितेतून
मी अशा छंद न् वृत्तात बहरलो कोठे

थेट हातात तुझा हातच धरतांना मी-
भूल झाली कुठली सांग बहकलो कोठे

पीत आलो नभ ओथंबून वर आलेले                               
मी गटारी अनुदानावर जगलो कोठे

ते किनाऱ्यावर थांबून विचारात होते                        
घेतला थांग कुठे मी अन् बुडलो कोठे

लोक ओलांडून जातात कसे ह्या गझला
शब्द एकेकच पुसतो मज अडलो कोठे

ह्या जगाचीच हमेशा चूक शोधात फिरलो
चूक आता कळली आपण चुकलो कोठे

संगतीने जर माणूस परखला जातो
मी कुणासोबत हप्ताभर टिकलो कोठे

शुष्कता कायम रोमातच भिनली माझ्या 
तू किती कोसळला मी पण भिजलो नाही.

५.
मातीमधुनी अंकुरताना तरुवर झालो-कृपाच तुमची; 
ऊन-वाऱ्याशी लढता लढता कणखर झालो–कृपाच तुमची.

जे–जे काही उणे दिसे ते माझे होते—माझे आहे!
तुम्ही दिलेल्या रंगांनी पण सुदंर झालो–कृपाच तुमची.

दिशा कळेना, सुचे न रस्ता चहुकडे अंधारच होता
तुम्हासंगती प्रकाशलेले अंबर झालो–कृपाच तुमची.

सत्य हेच की मुळात माझे काही नव्हते काही नाही...
तुम्ही बरसले नभापरी अन् सागर झालो-कृपाच तुमची.

सदैव मजला सावध करते निंदेचे काटेरी कुंपण.
दुर्गुण-मेंढया वळता–वळता धनगर झालो–कृपाच तुमची.

विद्वत्तेशी नाते नाही, कला-गुणांचा प्रान्त न माझा
स्वीकार केले जसा जसा मी सादर झालो—कृपाच तुमची.

असे नव्हे की सर्व ऋतुंनी अमृत वर्षावे  माझ्यावर
कडू घोटही गिळता–गिळता शंकर झालो–कृपाच तुमची

अवकाशाने मला दिलेल्या कक्षेतून मी धावत आहे
अंतरातली जाळत उर्जा अख्तर झालो कृपाच तुमची

किती काळ मी भ्रमात होतो माझ्या अन् माइया प्रतिमांच्या
ह्या   धुंदीतुन जागा झालो, लवकर झालो--कृपाच तुमची !

.............................................
शिवाजी जवरे
बुलडाणा.
७३७८७८८२७९ ssjaware@gmail.com                

No comments:

Post a Comment