विजय सातपुते : तीन गझला


१.
केलाय दूर  आता , वनवास पावसाने
दिधला चराचराला, सुखश्वास पावसाने.

एकेक झाड  आता, आहे तहानलेले
धाडूनिया दिले त्या  थेंबास पावसाने.

मातीतल्या घराचे, आभाळ सर्व काही
केले जिवंत पुन्हा , स्वप्नास पावसाने.

आश्वासने गुलाबी,  आधार माणसाला
दिधला नव्या ऋतूंचा,  मधुमास पावसाने

आयुष्य पालवीची झाली सुवर्ण पाने
या कोंदणी लिहीला,  इतिहास  पावसाने.

२.            
जीवनाची रूपरेषा, टाकली ठरवून मी
भावनांची वेशभूषा,  घेतली समजून मी.

काळजाची भावबोली ,  सांगते परतायचे 
आसवांची वेदवाणी, ऐकतो उकलून मी.

या दिलाची बाग ती ही, का वसंता पारखी
यौवनाचा चैत्र तो ही, वेचला उमलून मी.

चाळली मी कैक पाने,  घेतले तपसायला
पान कोरे जिंदगीचे ,  टाकले चघळून मी.

तापलेल्या वाळवंटी,  का मने हरखायची
ठेवले सारे तळाशी ,धूळ ती उडवून मी.

चाललो चालीत माझ्या, संगतीला
वाट माझ्या सोय-यांची , पाहिली बदलून मी.

लेखणीने  आज माझ्या, अंतरी जपला वसा
वेदनेच्या पावलांशी , घेतले जुळवून मी .

३.
मोडून टाक तू ही, ते बंध माधवी.
भाषा नवीन येते , ओठात लाघवी .

भासात श्वास माझे, जाता तुझ्या घरी
ते दार बंद झाले , जोषात वैभवी.

स्वप्नात  पावसाळा ,सत्यात ही उन्हे
वर्षाव आसवांचा आशेस नादवी.

घायाळ आठवांनी ,  पाहू कसे तुला
ठेवून याद गेली, टेचात शांभवी .

केला प्रवास सारा, माझ्या तुझ्या चुका
घेऊन काळ गेला ,सौख्यास यादवी

........................................................
विजय सातपुते

No comments:

Post a Comment